Sunday, March 26, 2017

पैसा पैसा हाय रे पैसा, उपर लेके जाऊँ कैसा...



आमच्या एका मैत्रिणीनं एक भन्नाट कल्पना सांगितली, जर अशी आकाशवाणी झाली की ‘एखाद्या माणसानं स्वतः कमावलेली सगळी संपत्ती त्याच्याबरोबरच नष्ट होईल.’ असं झालं तर काय होईल?
हा आमच्या विनोदाचा विषय झाला होता; पण खरंच असं झालं तर? एखादा माणूस मेला तर त्यानं घेतलेली महागडी कार, बांधलेला आलिशान बंगला, तिजोरीत, जमिनीत, छतात दडवून ठेवलेले बंडल त्याच्याबरोबरच गायब! मग माणूस एवढी मालमत्ता साठवून करेल काय? असं झालं तर माणूस खरं जगायला शिकेल. एक तर तो त्याला लागतं तेवढंच कमवेल आणि जास्त कमवलंच तर ते वाटून टाकेल. मग या जगात कुणीच गरीब राहणार नाही. व्वा! काय कल्पना आहे! पण दुःख याचं आहे की ही फक्त कल्पनाच आहे...
छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली, खूप संपत्ती मिळवली. याचा अर्थ शिवराय दरोडेखोर होते का? का त्यांनी ती सर्व संपत्ती रायगडावर साठवून ठेवली? असं त्यांनी केलं नाही म्हणून हा गुन्हा ठरला नाही. ही लूट त्यांनी केली ती स्वराज्यासाठी, स्वराज्यातील रयतेसाठी! आणि ही लूट करताना त्यांनी गरिबाला, सामान्याला अजिबात धक्का लावला नाही. ते छत्रपती होते!
आज त्याच छत्रपतींचं नाव घेणार्‍या समाजात काय होतं? आज एकाचा बंगला हा दुसर्‍याच्या रक्तावर उभा होतो. मी दोष देत नाहीये, अजिबात नाही. पैसा जरूर कमवावा. ती काळाची गरज आहे. पैसा कमवावा आणि त्याचा उपभोगही घ्यावा. यात गैर काहीच नाही. पण देश, समाज संकटात आणून, समाजस्वास्थ्य बिघडवून जर तो पैसा येत असेल तर त्याचा काय उपयोग? तुम्ही तुमचं आयुष्य जगाल, चांगलं जगाल पण त्याचवेळी कित्येकांच्या आयुष्याची राखरांगोळी कराल त्याचं काय? पण जाऊ द्या त्यानं तुम्हाला काहीच फरक पडणार नाही...
आजकाल राजकारण, शासकीय अधिकार पदं, एवढंच काय अध्यात्मगुरू, डॉक्टरी पेशा याकडं लोकं प्रचंड पैसा मिळवण्याचं साधन म्हणून बघतात. यातून पाहिजे तेवढा पैसा आणि प्रसिद्धी मिळू शकते. समाज कल्याणासाठी असणार्‍या या गोष्टी आता समाज विघातक बनत चालल्या आहेत.
छत्रपतींच्या लूटीच्या धर्तीवर मला एक कल्पना सुचली. जर एखाद्यानं काही सहकार्‍यांसोबत अशा वाममार्गानं पैसा कमावलेल्या हरामखोरांना लुटलं आणि तो पैसा चांगल्या कामासाठी वापरला किंवा कोणत्याही मार्गानं त्याला तो सत्कारणी लावायला लावला तर... कल्पना चांगली आहे... पण बेटा असं फक्त चित्रपटातच होऊ शकतं! आज असं लूटतील पण एका वाईट मार्गाचा पैसा दुसर्‍या वाईट मार्गाला लावतील...
 मी पैशाला वाईट मूळीच म्हणत नाहीये. खूप लोक पैशाला वाईट, शत्रू मानतात; पण तसं मूळीच नाही. पैसा हा शत्रू नाहीये तो फक्त एक कागदाचा तुकडा आहे; पण तो तुम्ही कसा कमावता आणि त्याचं काय करता हे महत्त्वाचं आहे. त्यावर तो वाईट ठरत असतो.
माणूस हा भावनाशील प्राणी आहे. प्रेम, क्रोध, राग लोभ, मोह, माया, मत्सर अशा अनेक भावना माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं बनवतात; पण यातील कोणत्याही भावनेचा अतिरेक झाला तर तो प्राण्यापेक्षाही घातक होतो. लोभापोटी हव्यास जन्म घेतो आणि हा हव्यास वाढला की माणूस माणूस राहत नाही.
म्हणजे बघा. पायी चालायला लागलं की सायकल... सायकल मिळाली की दुचाकी... दुचाकी मिळाली की चारचाकी... चारचाकी मिळाली की अजून चांगली चारचाकी... हे संपतच नाही. मग यासाठी काय लागतं तर पैसा आणि तो पैसा मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायचं.
मला खूप पैसा हवाय असं म्हणून त्याच्या मागं धावणार्‍या लोकांची मला कीव येते. ज्यासाठी ते पैसा कमवत असतात, म्हणजे सुख, समाधान, समृद्धी यांनाच विसरून, बाजूला सारून, सोडून देऊन ते फक्त पैशाच्या मागे धावत राहतात. कारण लहानपणापासून आपल्याला हेच शिकवलं जातं की तुला चांगलं जगायचं असेल तर जास्त पैसा कमावला पाहिजे आणि जास्त पैसे कमावण्यासाठी चांगली नोकरी केली पाहिजे. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम म्हणतात, आपल्या देशात जोपर्यंत चांगले शिक्षण म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना आहे तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होणार नाही.
पैसा मिळवणं खूप अवघड असतं का? ज्यासाठी बरेच लोक आपलं संपूर्ण आयुष्य निरसपणे पळण्यात घालवतात. या पैशाच्या मोहामुळं आणि अंधश्रद्धेमुळं लोक या उंदराच्या दौडीलाच आयुष्य समजून बसलेत. माझे एक गुरू मला म्हणायचे, ‘हे मार्केट म्हणजे पैशाचा समुद्र आहे. त्यातून पैसा कसा घ्यायचा म्हणजे चमच्याने, तांब्याने की बादलीने हे तुम्ही ठरवायचं.’
चांगल्या प्रकारे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. पण मुद्दा हा आहे की आमच्याकडे पैशाबद्दल अंद्धश्रद्धाच जास्त आहेत. आम्ही पैसा वाढवण्यापेक्षा पैसा साठवण्यावर जास्त विश्‍वास ठेवतो. माझ्याकडे पैसे नाहीत म्हटलं की संपलं... मग एक एक पैशासाठी धडपडत रहायचं. यासाठी रॉबर्ट कियोसाकी यांनी खूप छान थिअरी सांगितली आहे. कोणतीही गोष्ट मला परवडत नाही असं कधीच म्हणू नका, त्याऐवजी असं म्हणा, मला ती गोेष्ट कशी परवडेल... मग बघा तुम्ही कसे कामाला लागाल ते!
कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आधी आपण द्यायला शिकलं पाहिजे, हे आम्ही समजूनच घेत नाही. आम्हाला फक्त मिळवायचंय आणि साठवायचंय. लहानपणी एक खूप छान गोष्ट वाचली होती.
एक साधू एका गावातील कंजूस मानल्या जाणार्‍या व्यापार्‍याच्या घरी जातात व एक भाकरी मागतात. तो व्यापारी दार लावून घेतो. संध्याकाळी तो व्यापारी पाहतो तर साधू तिथेच. रात्री कंटाळून तो व्यापारी त्यांना एक भाकरी देतो. त्यावेळी साधू नकार देतात व दोन भाकरीची मागणी करतात. व्यापारी परत नकार देतो. असेच सात दिवस चालते. प्रत्येकवेळी साधू एक भाकरी वाढवून मागतात व व्यापारी नकार देतो. शेवटी साधूंची प्रकृती खालावलेली पाहून व्यापारी घाबरतो आणि साधूंना म्हणतो, ‘‘तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाकरी घ्या पण आता इथून जा.’’
त्यावर ते साधू म्हणतात, ‘‘आता मला भाकरी नकोच आहे. आता तू मला एक विहीर खोदून दे.’’
सुरूवातीला व्यापारी नकार देतो पर नंतर नाईजास्तव होकार देतो; पण त्यावर ‘मला काय मिळेल’ असं तो विचारतो. साधू म्हणतात, ‘‘तू दोन विहीरी खोद. एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. मी भ्रमंती करून जेव्हा माघारी येईन त्यावेळी जर तुझ्या विहीरीत माझ्या विहीरीपेक्षा जास्त पाणी असेल तर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन.’’
व्यापारी खुश होतो. आता साधूंकडून खूप संपत्तीचा आशिर्वाद मिळवण्यासाठी तो दोन विहीरी खोदतो. पाणी कमी होऊ नये म्हणून तो स्वत:ची विहीर झाकून ठेवतो आणि साधूंसाठी खोदलेल्या विहीरीतून संपूर्ण गावाला पाणी देतो. ते पाणी कमी करण्यासाठी तो सतत पाणी उपसत राहतो. काही दिवसांनी साधू परत येतात. तो व्यापारी खुशीने साधूंना दोन्ही विहीरी दाखवतो; पण त्याच्या लक्षात येते की आपली विहीर झाकून ठेवली असली तरी साधूंच्याच विहीरीत पाणी जास्त आहे. तेव्हापासून तो व्यापारी दाता म्हणून प्रसिद्ध होतो.

हा निसर्गाचा नियम आहे. काहीतरी मिळवण्यासाठी आधी तुम्हाला द्यायला शिकलं पाहिजे. पैशाच्या बाबतीतही हा नियम लागू होतो; पण तरीही लोक एवढा पैसा साठवून ठेवतात, याचच आश्‍चर्य वाटतं. पैशाच्या मागं धावण्यात सगळा वेळ, शक्ती घालवण्यापेक्षा पैशाला कामाला लावा आणि थोडा वेळ स्वत:साठी आणि आपल्या जीवलगांसाठी द्या.
पैसा पैसा हाय रे पैसा, उपर लेके जाऊँ कैसा...
जर आपल्यानंतर हे सर्व इथेच राहणार आहे तर मग त्यासाठी एवढा आटापिटा कशाला? आपल्या आजुबाजूला एवढ्या समस्या, उणीवा दिसत असताना आपण दगड होणं बरं नाही. स्वत: जीवन जगा आणि दुसर्‍याचं जीवन आनंदी होण्यासाठी थोडा प्रयत्न करा... बस्स!
खरंच पैसा एवढा महत्त्वाचा असतो का? नाही, सध्याच्या जगात पैसा महत्त्वाचा आहेच; पण तो किती आणि कसा? आणि फक्त पैसाच महत्त्वाचा आहे का? याचा पण विचार व्हायला हवा.

3 comments:

  1. तुषार खूपच छान विचार मांडलेता तू ह्या लेखात । मला तर फार आवडले आणि अतिशय मार्गदर्शक वाटले ।

    ReplyDelete
  2. तुषार मस्तच!
    तुम्हारे पास नही पैसे!
    तो लोग कहेंगे ना जाने
    कहांसे आ गए ऐसे वैसे!!

    ReplyDelete
  3. खूप चांगले विचार मांडले आहेत. असेच लेखन करत रहा.

    ReplyDelete